प्राध्यापक विनायक महादु गायके (जन्म २ फेब्रुवारी १९५६ ते १४ ऑक्टोबर २००८) हे एक समाज प्रबोधन चळवळीतील अग्रणी नेते व अध्यापक होते. त्यांच्या विचारांमुळे जो प्रभावित झाला तो-तो ज्ञानवंत झाला.
२ फेब्रुवारी १९५६ रोजी महादू रामा गायके व पार्वताबाई महादू गायके यांच्या उदरी पाचव्या पुत्राच्या रूपात ला खिर्डी ता. खुलताबाद जि. संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) या गावामध्ये साहेबांचा जन्म झाला. पण या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. भारत देश स्वातंत्र्य होऊन जेमतेम ९ वर्षे झालेली होती. देशात शिक्षणाची व्यवस्था खूपच दयनीय अवस्थेत होती. अशा कालखंडात शिक्षण घेणे ही एक जिकिरीची गोष्ट होती. खेड्यापाड्यात शाळेची व्यवस्था नव्हतीच. पण यातून मार्ग काढत त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील गायीच्या गोठ्यात भरणाऱ्या शाळेत घेतले.
व पुढे पाचवीपासून तालुक्याच्या गावी पायी जाऊन १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण औरंगाबाद येथे घेतले. पुढे विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांच्या हातात पदवी असूनही नोकरी नव्हती. याच काळात कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात जागा निघाल्या, तेथे गायके साहेब प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पण जो व्यक्ती विचारवंत असतो व ज्याच्यात काही नवीन निर्माण करण्याची जिद्द असते, तो शांत बसत नाही. त्यांच्यातील असलेल्या विचारवंताने त्यांना औरंगाबाद येथील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात जाण्यास भाग पाडले व त्यांची तेथे नियुक्ती झाली.
पुढे त्यांनी शिक्षण कार्यात स्वतःला सामावून घेतल्यानंतर समाज कार्यातही भाग घेतला. पंडित नेहरू कॉलेजच्या मुलांना घेऊन खिर्डी येथे त्यांनी ग्राम स्वच्छता कॅम्प घेतले. याच काळात त्यांनी काही नाटकांची पुस्तकेही लिहिली. त्यातील एक नाटक “केलंच तुला, झालं मला” या नाटकात त्यांनी स्वतः अभिनय करून खिर्डी येथे सादरही केले होते.
खिर्डी येथील मुले शिक्षणासाठी बाहेरगावी किंवा तालुक्याला पायी जात असत, याची खंत त्यांना सतत वाटत होती. म्हणून त्यांनी खिर्डी येथे माळीसाहेबांच्या मदतीने आपले विद्यालय सुरू केले. पण ते तेवढ्यावरच न थांबता, खुलताबाद तालुक्यातील अति दुर्गम भाग तिसगाव येथे नवनाथ अधाने सर यांना बरोबरीला घेऊन “सत्यशोधक महिला विकास मंडळाच्या” माध्यमातून तिसगाव विद्यालयाची स्थापना केली. ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा सुरू करून मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय केली. तसेच बेरोजगार तरुणांना शिक्षण क्षेत्रात व इतर शासकीय, निमशासकीय खात्यात नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली.
त्यावेळचे गृहमंत्री मा. छगनजी भुजबळ साहेब यांच्यामुळे ते समता परिषदेशी जोडले गेले व नाशिक येथील समता परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे १९९७-९८ च्या विधानसभा निवडणुकीत ते खुलताबाद-गंगापूर मतदारसंघातून आमदारकीसाठी उभे राहिले, परंतु त्यांना अपयश आले. तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी सिल्लोड येथे गोरगरिबांसाठी आरोग्य सेवा सुरू केली. तसेच परितक्त्या स्त्रियांसाठी औरंगाबाद येथे शिलाई मशीनचा कोर्स केंद्र सरकारच्या सहाय्याने सुरू करून, त्यांना सन्मानाने जगण्यास मदत केली व विविध तांड्या-वस्त्यांवर अंगणवाड्या सुरू केल्या.
असे माझे, आमचे व समाजाचे विनायक गायके साहेब हे सर्वगुण संपन्न व अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. पुढे त्यांना आजाराने ग्रासले.
अशा मा. गायके साहेबांना माझा शत-शत नमस्कार व मानाचा मुजरा!